विदर्भवादी नेते अरूणभाऊ केदार यांची भिष्मप्रतिज्ञा
विदर्भ निर्माण संकल्प यात्रा आरमोरीत जल्लोषात स्वागत
माजी मंत्री, आमदार,संस्थापक व बहुसंख्य विदर्भवादी उपस्थित
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): संविधानाच्या कलम ३नुसार यंदा विदर्भ मिळविल्याशिवाय श्वास सोडणार नाही असे रोखठोक प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रवर्तक तथा पूर्व विदर्भ अध्यक्ष अरूणभाऊ केदार यांनी केले.
ते विदर्भ निर्माण संकल्प यात्रेचे आरमोरी शहरात आगमनप्रसंगी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी विचार मंचकावर विराआस कोअर कमिटी सदस्य तथा माजी आमदार हरिरामजी वरखडे, माजी मंत्री रमेशकुमार गजबे, माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी, संस्थापक डॉ.राजकुमार शेंडे,विराआसचे जिल्हा उपाध्यक्ष शालिक पाटील नाकाडे, कुरखेडा शेतकरी संघटनेचे नेते ठाकूर,बडोले,मत्ते, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, शिवसेना महिला आघाडी नेत्या कल्पना तिजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
पूढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या ६५ वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ करण्याचे राज्यकर्ते विविध पक्षांचे आश्वासन हवेतच विरले आहे.गत ११वर्षापासून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही सारे लढा देत आहोत.विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या कार्यकाळात विदर्भ आंदोलन आघाडीवर होते.तशीच आघाडी आता सर्वांच्या सहकार्याने घ्यायची आहे.त्याकरिता ३१डिसेंबरची डेडलाईन सरकारला दिली आहे.याची तत्काळ दखल केंद्र सरकारने घ्यावी.अन्यथा आमचे पुढील वाटचालीसाठी नियोजन तयार असल्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक माजी आमदार हरिरामजी वरखडे म्हणाले की, आम्ही पुर्वीपासून विदर्भाचे पुरस्कर्ते आहोत.विदर्भात मुबलक प्रमाणात वीज,जल, जंगल, जमीन असतांना उद्योगधंद्यांची वाणवा आहे.विदर्भ दिवसेंदिवस मागास होत आहे.हे विदर्भाचे दुर्देव राज्यकर्ते यांच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे आहे.अशी टीका त्यांनी केली.
तसेच माजी मंत्री रमेशकुमार गजबे यांनी विदर्भातील विविध महत्वपूर्ण मुद्दे मांडले व केंद्र सरकारला आता विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी भाग पाडू असा आशावाद व्यक्त केला.माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी यांनी विदर्भ राज्य निर्मिती करिता जनतेने आता उठाव करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.विदर्भाचा मुद्दा आपण शिवसेना पक्षात असतांना मांडला असतांना त्यावेळी आपली बाळासाहेब यांच्या कोर्टात सुनावणी झाली होती.अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.प्राचार्य डॉ.राजकुमार शेंडे यांनी संविधानातील कलम ३, छोट्या राज्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना, विकसित राज्य, विदर्भात वाढत असलेला बॅकलॉग यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले.तसेच याकरिता उपाययोजनाही सुचवत आता भव्य जन आंदोलनाची गरज असल्याचे प्रतिपादित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास मेश्राम यांनी केले.तर प्रास्ताविक हंसराज बडोले यांनी केले.आभार शालिक पाटील नाकाडे यांनी मानले.