करुया निर्धार वन्यजीव संरक्षणाचा !
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):- विश्वामध्ये पर्यावरण व वन्यजीव संरक्षण करण्याच्या उद्देशाने 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.अलीकडच्या काळात वन्यजीवाचे संकट संपूर्ण जगामध्ये दिसून येत आहे. वन्यजीवाचे अधिवास,भक्ष्य आणि मानवी धोके यामुळे वन्यजीव संकटात सापडलेले आहेत.
जागतिक वन्यजीव दिवस निमित्त विविध प्रकारचे प्राणी, पक्षी,पर्यावरण,वृक्ष,झाडे यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे याकरिता जागतिक वन्यजीव दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. काही वर्षांपूर्वी पहाटे कावळ्याचा कावकाव चिमण्याचा चिवचिवाट कानी पडताच मानवी मन अगदी प्रसन्न होत असायचा परंतु अलीकडच्या काळात इंटरनेटचे उंच उंच मनोरे त्यातून निघणाऱ्या लहरी पशु- पक्ष्यांसाठी काळ ठरीत आहेत. एकीकडे मानवी जीवन सुखमय करण्याच्या नादात निसर्ग सृष्टीला धोका उत्पन्न होत आहे. जीवजंतू, प्राणी, पक्षी यांचे अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. मानव प्रगतीच्या नादाला लागून निसर्गसृष्टीचा ऱ्हास करीत असल्याची जाणीव होत आहे. मानवीजीवन व सृष्टी अबाधित ठेवण्यासाठी निसर्गाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. नुकताच उन्हाळा सुरू झालेला आहे अनेक ठिकाणी प्राण्यांना, पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची,खायची सोय नसल्यामुळे अनेक पक्षी, प्राणी तहानेने,भुकेने व्याकुळ होऊन आपले प्राण गमवित असतात. अशा प्राणी, पक्षी यांना माणुसकीची थाप देऊन पक्षी, प्राणी यांना पानवठे,खाद्यान्न यांची सोय करणे निसर्गातील घटक मानव या नात्याने गरजेचे आहे. प्रगतीच्या नावाने सीमेंटच्या जंगलात वाढ होऊन जंगले निर्जन होत चालली आहेत. अलीकडच्या काळात अनेक प्राणी, पक्ष्याच्या जसे गिधाड,घार,सारंग,उदमांजर, उडती खार,सापाच्या विविध प्रजाती ह्या लुप्त झाल्याने निसर्गप्रेमी,वन्यप्रेमी याच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या जागतिक वन्यजीव दिवशी वन्यजीव,पक्षी यांचे संरक्षण कण्याचा निर्धार प्रत्येक नागरिकाने केला तर पक्षी, प्राणी व मानव यांच्यातील संघर्ष कमी करून निसर्गाचे संवर्धन करता येवू शकतो. यामध्ये शासन व वन्यप्रेमी यांची भूमिका महत्त्वाची आहे.
देवानंद दुमाने .
अध्यक्ष
वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण
संस्था,आरमोरी जिल्हा-गडचिरोली