विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली : राज्य मंडळ, कार्यालय पुणे यांचे मार्फत फेब्रु/मार्च-२०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) लेखी परिक्षा दिनांक १० फेब्रुवारी २०२६ ते दि.१८ मार्च २०२६ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी परिक्षा दिनांक २० फेब्रुवारी २०२६ ते दि.१८ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.
परिक्षा केंद्रावर परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पडतील व तेथील परिक्षार्थीना तणावमुक्त वातावरणात परिक्षा देणे शक्य होईल अशी व्यवस्था करावी म्हणून सदर परिक्षा केंद्रांच्या परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम १६३ अन्वये मनाई हुकुम जारी करणे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता आवश्यक झाले आहे.
त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, अविश्यांत पंडा यांना प्राप्त अधिकारा अंतर्गत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये सदर परिक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सदर परिक्षा केंद्राच्या २०० मिटर अंतरापर्यंत पुढीलप्रमाणे बाबी/कृत्ये करण्यास मनाई आदेश जारी केले आहे.
परीक्षा केंद्राचे परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती परिक्षार्थी व परीक्षार्थी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राचे परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल. असे कृत्य करण्यात येणार नाही. निषिद्ध क्षेत्रात झेरॉक्स मशीन, पानपट्टी, टायपिंग सेंटर, फॅक्स व एस टी डी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे परिक्षा कालावधीत सुरु राहणार नाही. परिक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा इत्यादींचा वापर करता येणार नाही. निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, भाषण करणे, घोषणा करता येणार नाही. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर ठेवता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेता येणार नाही. परिक्षा केंद्रापासून २०० मीटर अंतरावर चुन्याची लाईन आखण्यात यावी.
सदर आदेश कर्तव्य बजावणारे वरिष्ठ अधिकारी, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना लागू राहणार नाही. पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांनी परिक्षेच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करून आवश्यक पोलीस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही व जबाबदारी पार पाडावी.
सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणा-याविरुद्ध फौजदारी नियमांतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
तसेच सदर अधिसूचना परिक्षेच्या दिनांकास सकाळी ०८.०० वाजेपासून ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यत अमलात राहील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
0000








