विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.१९ : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी पासून ते 6 मार्च 2026 रोजी पर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे.
सध्या सुरू असलेल्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा, 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इयत्ता 10 वीच्या परीक्षा, तसेच होळी, धुलिवंदन आणि शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय माओवादी संघटनेकडून टि.सी.ओ.सी. कालावधीत संभाव्य हिंसक कारवायांची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आदेश जारी करण्यात आला आहे.
या कालावधीत शस्त्र, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगडफेक साहित्य जमा करणे, आवेशपूर्ण व उत्तेजक भाषणे देणे, तसेच संबंधित प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी शिवाय मिरवणूक, सभा किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीची सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000









