शेतकरी योजनांचा प्रलंबित निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करा

49

मनसे तालुका अध्यक्ष भगवान कामथे यांची मागणी

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी( जिल्हा गडचिरोली) :- शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य शासना तर्फे सुरू असलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान योजनाचे अनुक्रमे २०वा आणि ७ वा हप्ता वितरित होण्यास विलंब झाल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगाम सुरू असतानाही पाच महिने लोटूनही गेले तरीही हा निधी त्यांच्या खात्यावर जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यात नाराजीचा सूर आहे.त्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ शेतकरी वर्गाच्या खात्यात पैसे जमा करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष भगवान कामथे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासन दरवर्षी ६ हजार रुपये तर राज्य शासन नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत ६ हजार रुपये अशी एकूण १२ हजार रुपये मदत चार महिन्याच्या अंतराने प्रत्येकी ४हजार रुपये च्या तीन हप्त्यात थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे जमा करत असते. या योजनेचा शेवटचा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये जमा झाला होता. त्यानंतर तब्बल पाच महिने उलटूनही जुलै महिना संपत आला आहे. तरीही केंद्राचा २०वा आणि राज्याचा ७वा हप्ता वितरित झाला नाही. परिणामी खरीप पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना बी बियाणे,खते, औषधी,घरगुती खर्च आणि मुलाच्या शिक्षणाचा भार पेलताना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या दोन्ही योजना मधून मिळणाऱ्या निधीचा शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठा आधार मिळतो.

मागील महिन्याच्या अखेरीस हप्ता जमा होईल अशी आशा शेतकऱ्यात निर्माण झाली होती. मात्र ते महिने निघून गेलेत. आता जुलै महिना संपत असताना सरकारने अद्याप निधी वितरित केलेला नाही. त्यामुळे शासनाचे लाभार्थी शेतकरी चातकासारखे या पैशाची वाट पाहत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत असून शासनाने तात्काळ हप्ता वितरित करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा. अशी मागणी आता मनसे व शेतकऱ्याकडून केली जाते आहे.