हत्तीचा धुडगूस; धान पिकांची केली नासधूस

410

धान उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी

आपदग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली ): आरमोरी तालुक्यातील मौजा पळसगाव क्षेत्रातील बांध्यातील उभ्या धान पिकांची रानटी हत्तींनी धुडगूस घालत नासधूस केल्याची घटना दिनांक २४ मे च्या मध्यरात्री घडली.सकाळी शेतात शेतकरी यांनी प्रत्यक्ष जाऊन बघितले असता त्यांचे तोंडचे पाणी पळाले.त्यामुळे पळसगाव क्षेत्रातील शेतकरी वर्गाचे शेतबांध्यावर जाऊन महसूल विभागाने सर्वेक्षण करावे व तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी एकमुखी मागणी आपदग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरमोरी तालुक्यातील पळसगाव क्षेत्रातील शेतकरी यांनी आपले शेतात उन्हाळी हंगामात धान पिकांची लागवड केली.सदर धानपीक लागवड करताना त्यांनी स्वतः हजारो रुपयांचा पेरणी ते कापणी व मळणी पर्यंत खर्च गृहीत धरून केला.आता मे महिन्यात ऐन धानपीक काढणीस आल्यावर याचवेळी रानटी हत्तींनी धुडगूस घातला आणि धानपिकाचा फडशा पाडला.यात पळसगाव येथील श्रीमती देवकाबाई मेश्राम यांच्या ०.२० हे.आर,दिनकर मने ०.१० हे.आर, शामराव लिंगायत ०.०५ हे.आर , हजारे यांच्या शेतातील पुंजणे तसेच इतरही शेतकरी वर्गाच्या धान पिकांची अतोनात नुकसान झाली आहे.

सदर बाबीचे गांभीर्य ओळखून आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी एकमुखी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.