अन्यथा लोकहित संघर्ष समिती तर्फे जनआंदोलन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी, दिनांक:७आॅगस्ट२०२४:– गेल्या पंधरवड्यात झालेल्या अति पावसामुळे आरमोरी विभागांतील राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य रस्त्यांची चाळण झालेली आहे. पादचारी व विविध प्रकारचे वाहनचालक,नागरिक यांच्या अपघाताच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ दखल घेऊन रस्ते दुरुस्ती करावी अन्यथा लोकहित संघर्ष समितीतर्फे भव्य आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने आरमोरी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांना दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आरमोरी गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वर सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने शेती व रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे व रस्त्यावरील डांबर व गिट्टी मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने खड्डे पडलेले आहेत व त्या खड्यात पावसाचे पाणी जमा होत आहे त्यामुळे सदर मार्गाने आवागमन करणाऱ्या वाहन चालकांना त्याचा अंदाज न येत आल्याने सातत्याने अपघात होत आहेत आणि त्यामुळे मोठया जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सदर मार्गाची राष्ट्रीय महामार्ग विभागाने गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा येत्या ८ दिवसात लोकहित संघर्ष समिती, आरमोरी तर्फे जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे.
यावेळी लोकहित संघर्ष समितीचे सदस्य आशुतोष गिरडकर ,देवानंद दुमाने सारंग जांभुळे ,राहुल जुआरे ,पंकज इंदुरकर ,मनोज गेडाम ,लीलाधर मेश्राम, रोहित बावनकर,प्रथमेश सारवे ,गोपाल नारनवरे ,सुमित खेडकर ,सुरज ठाकरे ,विशाल चौके , अंकित बनसोड उपस्थित होते.








